टाकवेतील लक्ष्मीनगरमधील मुख्य रस्त्याचा ‘वनवास’ संपला; १२ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कामाचा शुभारंभ
सरपंच अविनाश असवले यांच्या पुढाकाराने टाकवे येथील रस्त्याचा प्रश्न मार्गी; ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण

टाकवे बुद्रुक – टाकवे बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीतील लक्ष्मीनगर परिसरातील मुख्य रस्त्याचा गेल्या १० ते १२ वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न अखेर सुटला आहे. सरपंच अविनाश असवले यांच्या विशेष पुढाकारातून सर्व तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणींवर मात करत या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन नुकतेच मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
गेल्या एका तपाहून अधिक काळापासून लक्ष्मीनगर परिसरातील मुख्य रस्ताच नसल्याने स्थानिक नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. हा रस्ता तातडीने तयार करण्यात यावा, यासाठी परिसरातील नागरिकांनी अनेकदा लोकप्रतिनिधींकडे लेखी पत्रव्यवहार आणि पाठपुरावा केला होता. मात्र, सातत्याने काहीना काही अडचणी उद्भवल्याने रस्त्याचे काम रखडले होते.
या गंभीर समस्येची दखल घेत सरपंच अविनाश असवले यांनी रस्ता मार्गी लावण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांनी सातत्याने पाठपुरावा करून सर्व अडथळे दूर केले आणि अखेर या कामाला मुहूर्त मिळाला. रस्त्याचे काम सुरू झाल्यामुळे स्थानिक नागरिकांनी आणि ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
रस्त्याच्या कामाचा शुभारंभ सरपंच अविनाश असवले यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आला. याप्रसंगी पुणे पीपल्स बँकेचे संचालक संजीव असवले, माजी उपसरपंच स्वामी जगताप, माजी संचालक दिलीप आंबेकर, विलास साबळे उपस्थितीत होते.
तसेच, स्थानिक नागरिक बजरंग जांभुळकर, काशिनाथ जांभुळकर, सोनबा लष्करी, बबन जांभुळकर, संजय पुराणे, सुरेश तळावडे, दशरथ कोठावळे, सादीक अत्तार, विठ्ठल तुर्डे, गणेश जांभुळकर, रोहीदास थरकुडे, पांडुरंग मोढवे, सुभाष खुरसुले, संजय नवले, संतोष लष्करी, दादाभाऊ माळी, विक्रम जांभुळकर, जालिंदर आलम, सागर जांभुळकर, भास्कर जांभुळकर आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“गेल्या १०-१२ वर्षांपासून या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली होती. पावसाळ्यात तर येथून ये-जा करणे म्हणजे कसरत असायची. अनेकदा पाठपुरावा करूनही तांत्रिक अडचणींमुळे काम रखडले होते. मात्र, सरपंच अविनाश असवले यांनी स्वतः लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावल्याने आम्हाला मोठा दिलासा मिळाला आहे.”
– विठ्ठल तुर्डे, स्थानिक रहिवासी लक्ष्मीनगर टाकवे बुद्रुक
“आमच्या लक्ष्मीनगर भागाचा रस्त्याचा प्रश्न सुटावा, यासाठी आम्ही अनेक वर्षांपासून प्रतीक्षा करत होतो. आज रस्त्याचे भूमिपूजन झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गावच्या विकासासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल असून, सर्व अडचणींवर मात करत काम सुरू केल्याबद्दल आम्ही सरपंच अविनाश असवले यांच्यासह संपूर्ण ग्रामपंचायतीच्या सदस्याचे आभार मानतो.”
– काशिनाथ जांभुळकर
स्थानिक रहिवासी लक्ष्मीनगर टाकवे बुद्रुक



