आमदार सुनील शेळके यांचा “तो शब्द” — इंदोरी-वराळे जिल्हा परिषद गटाला लागू होणार का?
..
इंदोरी – मावळ तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा जलवा चांगलाच वाढला आहे. राजकीय गोटांमध्ये चर्चा, बैठका आणि समीकरणे यांची लगबग सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर मावळचे लोकप्रिय आमदार सुनील शेळके यांच्या एका वक्तव्याची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. आपल्या शब्दासाठी पक्के, तत्त्वनिष्ठ आणि विकासासाठी झटणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. मावळच्या विकासकामांबाबत त्यांचा ठसा महाराष्ट्रभर उमटलेला आहे. अगदी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनीही त्यांच्या कामाची दखल घेतलेली आहे.
मात्र, सध्या सर्वांच्या चर्चेचा विषय आहे तो म्हणजे — आमदार सुनील शेळके यांनी काही दिवसांपूर्वी केलेलं वक्तव्य:“कोणताही उमेदवार माझा नातलग, जवळचा किंवा घरचा आहे म्हणून उमेदवारी दिली जाणार नाही. जात, धर्म, पंथ या पलीकडे जाऊन जो खऱ्या अर्थाने जनतेतून निवडून येऊ शकतो, त्याच्यावर अन्याय होणार नाही.”
हे वक्तव्य केवळ शब्दांपुरतं न राहता ते कृतीत उतरवतील का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. विशेषतः इंदोरी-वराळे जिल्हा परिषद गटात या विधानाचा परिणाम होणार का, हा मोठा प्रश्न सर्वत्र चर्चिला जात आहे. कारण हा गट सध्या मावळमधील सर्वात चर्चेत असलेला गट ठरला आहे. येथे अनेक इच्छुक उमेदवार चुरशीने तयारी करत असून, जात-पात, पक्षनिष्ठा आणि स्थानिक समीकरणे या सर्व घटकांचा ताण वाढलेला आहे.
जनतेचा प्रश्न आहे — आमदार सुनील शेळके नात्यागोत्यापेक्षा, जातीधर्मापेक्षा प्रामाणिक आणि काम करणाऱ्या उमेदवाराला संधी देतील का? त्यांनी दिलेला “शब्द” इंदोरी-वराळे गटातही तसाच पाळला जाईल का?राजकीय वर्तुळात सध्या हेच समीकरण चर्चेत असून, मावळ तालुक्यातील नागरिक उत्सुकतेने पाहत आहेत की आमदार शेळके आपल्या तत्त्वनिष्ठेवर आणि शब्दावर कितपत ठाम राहतात. या निर्णयावर केवळ इंदोरी-वराळेच नाही, तर संपूर्ण मावळातील राजकीय दिशा अवलंबून राहणार आहे.



