आधुनिक तंत्रज्ञानामुळेच शेतकऱ्यांची प्रगती; बाळासाहेब थोरातांकडून मुकुंद ठाकरांच्या ‘साई रोझेस’चे कौतुक

येळसे (पवनानगर) – शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास उत्पादनात निश्चितच वाढ होते आणि शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे पवनानगर येथील पॉलीहाऊस शेती आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी कृषीमंत्री व ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केले.
येळसे येथील ‘पवना संस्कृती साई रोझेस’ या कंपनीला बाळासाहेब थोरात व त्यांची मुलगी जयश्री थोरात यांनी आज सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी आधुनिक शेतीचा आदर्श ठरलेल्या या प्रकल्पाची पाहणी केली आणि समाधान व्यक्त केले.
भेटीदरम्यान थोरात यांनी पॉलीहाऊसमधील फुलांच्या विविध जाती, पाण्याचे नियोजन आणि खत व्यवस्थापन यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती घेतली. तसेच, उपस्थित शेतकऱ्यांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या प्रगतीचा आढावा घेतला.
यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात यांनी युवा शेतकरी मुकुंद ठाकर यांच्या कार्याचा विशेष गौरव केला. ते म्हणाले की, “मुकुंदजी ठाकर यांनी अत्यंत कमी वयात अत्याधुनिक फुल व्यवसायात घेतलेली भरारी कौतुकास्पद आहे. जिद्द आणि कष्टाच्या जोरावर त्यांनी उभारलेला हा प्रकल्प परिसरातील इतर तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.”पॉलीहाऊस शेतीमुळे पारंपारिक शेतीला एक उत्तम पर्याय मिळाला असून, यामुळे उत्पादनवाढ आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीस लागल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.



