उद्योजक ते प्रगतशील शेतकरी; आधुनिक शेतीत यशाचे नवे शिखर गाठणारे नवनाथ मालपोटे
अभिष्टचिंतन सोहळा निमित्ताने विशेष लेख

मावळ प्रतिनिधी- “जिद्द, मेहनत आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली तर शेतीही सोनं पिकवू शकते,” याचे जिवंत उदाहरण म्हणजे मावळ तालुक्यातील फळणे गावचे युवा उद्योजक तथा प्रगतशील शेतकरी नवनाथ काळुराम मालपोटे. उद्योग व्यवसाय यशस्वीपणे सांभाळत असतानाच त्यांनी आपल्या वडिलांचा शेतीचा वारसा आधुनिक पद्धतीने पुढे नेला असून, आज ते परिसरातील अनेक तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत.
शेतीकडे केवळ पारंपरिक व्यवसाय म्हणून न पाहता तिला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याचा ध्यास त्यांनी घेतला. सध्या त्यांनी आधुनिक पद्धतीने इंद्रायणी भाताची लागवड करून विक्रमी उत्पादन घेतले आहे. त्यांच्या शेतातील दर्जेदार इंद्रायणी भात बियाण्याला मावळसह परिसरातील शेतकऱ्यांकडून मोठी मागणी असते. उत्कृष्ट गुणवत्ता, शास्त्रीय पद्धतीने केलेली लागवड आणि सातत्यपूर्ण उत्पादन यामुळे त्यांनी विश्वासार्ह शेतकरी म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
याचबरोबर शेती अधिक फायदेशीर आणि भविष्याभिमुख करण्याच्या उद्देशाने त्यांनी पॉलीहाऊस उभारणी करून आधुनिक शेतीच्या नव्या पर्वाची सुरुवात केली आहे. बदलत्या हवामानाचा सामना करत उच्च दर्जाची आणि अधिक उत्पादनक्षम शेती करण्याचा त्यांचा हा प्रयत्न इतर शेतकऱ्यांसाठीही मार्गदर्शक ठरत आहे.
नवनाथ मालपोटे यांनी सिद्ध करून दाखवले आहे की, उद्योग आणि शेती यांचा समतोल साधत आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास शेती हा अत्यंत लाभदायक व्यवसाय ठरू शकतो. त्यांच्या कार्यामुळे ग्रामीण भागातील अनेक युवकांना शेतीकडे नव्या दृष्टीने पाहण्याची प्रेरणा मिळत आहे.
वाढदिवसानिमित्त नवनाथ काळुराम मालपोटे यांना हार्दिक शुभेच्छा! त्यांच्या पुढील वाटचालीस उत्तरोत्तर यश लाभो, त्यांनी आधुनिक शेतीत अशीच नवनवी शिखरे सर करीत मावळच्या कृषी क्षेत्राचा गौरव वाढवत राहावा, हीच सर्वांकडून सदिच्छा.



