करंजगावात पत्रकार दिनी गरजूंच्या आयुष्यात ‘मायेची ऊब’ आणि विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना ‘सायकल’ची गती
पत्रकार दिनानिमित्त स्तुत्य उपक्रम; २६ विद्यार्थ्यांना सायकलींचे तर १०० आदिवासी बांधवांना ब्लँकेटचे वाटप

करंजगाव – मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक, ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त केवळ उपचार म्हणून कार्यक्रम न घेता, मावळ तालुक्यातील पत्रकारांनी सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला आहे. पत्रकार दिनाचे औचित्य साधून करंजगाव (ता. मावळ) येथे शालेय विद्यार्थ्यांना सायकली आणि आदिवासी बांधवांना ब्लँकेट वाटप करून माणुसकीचा जागर करण्यात आला.
मावळ तालुका मराठी पत्रकार संघ आणि पसायदान संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी ज्याप्रमाणे लेखणीच्या माध्यमातून समाजाला दिशा दिली, त्याच विचारांचा वारसा जपत पत्रकारांनी हा दिवस सार्थकी लावला.
या उपक्रमांतर्गत करंजगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील २६ गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले. शाळेत येण्यासाठी होणारा प्रवास सुखकर व्हावा आणि शिक्षणाची गोडी वाढावी, या उद्देशाने ही मदत देण्यात आली. तसेच, कडाक्याच्या थंडीपासून संरक्षण व्हावे यासाठी गावातील १०० आदिवासी महिला व पुरुषांना मायेची ऊब म्हणून ‘ब्लँकेट’ वितरित करण्यात आले.
कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना पसायदान संस्थेचे संजीव येलगे यांनी उपक्रमाचे कौतुक केले. ते म्हणाले, “सायकलमुळे केवळ प्रवासाची सोय होत नाही, तर शारीरिक आरोग्यही उत्तम राहते. विद्यार्थ्यांनी सायकलचा वापर करून पर्यावरण संवर्धनात हातभार लावला पाहिजे.”
यावेळी पत्रकार दिनाचे औचित्य साधून उपस्थित सर्व पत्रकारांचा ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला. सामाजिक भान आणि पत्रकारितेच्या मूल्यांचा संगम साधणारा हा उपक्रम उपस्थितांच्या विशेष कौतुकास पात्र ठरला.
या कार्यक्रमास मावळ तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुदेश गिरमे, कार्याध्यक्ष विशाल विकारी, उपाध्यक्ष भारत काळे, सचिव रामदास वाडेकर, प्रकल्प प्रमुख गणेश विनोद, ज्येष्ठ सल्लागार ज्ञानेश्वर वाघमारे, खजिनदार संकेत जगताप, तसेच कामशेत शहर अध्यक्ष चेतन वाघमारे चेतन वाघमारे, वडगाव शहर उपाध्यक्ष विशाल कुंभार, कामशेत सदस्य शिवानंद कांबळे, प्रफुल्ल ओव्हाळ, सागर शिंदे, प्रशांत पुराणिक, रेश्मा फडतरे, संजय हुळावळे आदी पत्रकार उपस्थित होते.
तसेच पसायदान संस्थेचे राजेश बद्रे, संजीव येलगे, वर्षा येलगे, रत्नाकर जाधव, अभा गुप्ता, सागर काकडे यांच्यासह गावचे कारभारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात पोलीस पाटील राजश्री तंबोरे, सरपंच उज्वला पोटफोडे, माजी सरपंच कौशल्या पवार, शरद सोरकाते, उपसरपंच नवनाथ ठाकर, ग्रामपंचायत सदस्य श्रीरंग गोडे, ग्रामसेवक चंद्रकांत मोरे, योगेश माझिरे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणेश साबळे, संतोष पवार, अशोक गोडे, सुदाम कुडले, कांताराम दहातोंडे, रवींद्र पवार, सुरेश वाघमारे, काळूराम वाघमारे, लक्ष्मण वाघमारे, साधू पोटफोडे, संदीप पोटफोडे, विजय खेंगले, सोमनाथ पोटफोडे, जयश्री कुडले, सविता मिसाळ, आरती साठे, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सुरेखा पोटफोडे, काजल साबळे, पुनम ठाकर, सुषमा शेलार, तुकाराम भालशिंगे, पुनम पोटफोडे, सतीश कांबळे, सुरेश उंडे यांचा समावेश होता.



